PustakNaka
जिथं ट्रॅफिक वाचकांचं!
27/07/2026
बैल माझ्या गोठयातील...पिढया पिढयांचा प्रकाश................................................................
भारतीय संस्कृती म्हणून जगाच्या पटलावर असलेली रानटी आणि अघोरी बाबा बुवांची भूमी अशी विपरीत प्रतिमा जगात आहे. मात्र याच्या उलट इथली जीवनशैली आहे. या इंडस सभ्यतेचा मूलाधारच मूळात निसर्ग आहे. रूतुचक्रानुसार इथले सण जरी पाहिले तरी इथं मूळस्थानी प्राणीमात्र आणि झाडपेड आहे. मग तो मूळाचा सण बेंदूर असो की रूतूचक्राची सांगता करणारा मनातल्या विकारांना आणि दंभाला वाट करून देणारा शिमगा.. इथं जशी वटवृक्षाची पूजा केली जाते तशी सर्पांचीही...निसर्गाकडून घेवून निसर्गाला क्रुतज्ञताभाव म्हणून म्हणून परत करण हे रिसायकलींग ही सभ्यता शिकवते. निसर्गाच्या सोबतीनं आपलं जगणं साजरं करणार्या या भूमीत शेतकर्याला अन्नदाता आणि बळीराजा ही उपमा याच कृतज्ञतेतून आहे .. या सर्व जैवचक्राच्या केंद्रस्थानी असलेला प्राणी बैल म्हणूनच प्रियस्थानी आहे.. भारतीय आणि ओघाने महाराष्ट्रीयन बैलाचे ऐतिहासिक महत्व समजावून घेताना थोडे मागे जावे लागेल..
बैलाच्या झुंजी (bullfight) ज्याला आपल्याकडे बैलझोंबी म्हणतात तर दक्षिणेकडे जलीकट्टू म्हणतात त्या पूर्वी सर्रास चालत असत. भारतात जेव्हा राजेशाही होती तेव्हा या झुंजी मर्दानी खेळाचा भाग होत्या.. त्यामुळे दर्जेदार प्रजातींची जोपसाना, देखभाल व्हायची..त्यासाठी वेगळे कोष होते.
भूतदयेच्या कारणावरुन काही वर्षे शर्यतबंदी होती ती आता उठवली गेली..पेटा सारख्या भूतदयेसाठी काम करणार्या संस्थेचा प्राणिमात्रविषयक दृष्टीकोन,आणि शर्यतीदारम्यान घडणारे अमानवी अत्याचार हे एक महत्वाचे कारण होते. २०११ साली बैलाचा सरक्षीत प्राणी (protected animal) यादीत समावेश झाला. मात्र कालांतराने प्राण्यावरचे अत्याचार वाढले. तरीही शर्यत थांबली नाही.. कारण त्यातूनच बैल हा प्राणी त्याच्या विविध प्रजाती टिकून राहिल्या.. एक बैल जेव्हा शर्यतीसाठी तयार होतो त्यावेळी संपूर्ण गोवंश जोपासला जातो. देशी प्रजाती टिकून राहायला शर्यत आणि त्यातील अर्थकारनाची भूमिका महत्वाची आहे. बैलाच्या शर्यतीमुळे कासरे दोरखड बनवणारे, बैलगाडीचे ढाचे बनवणारे, नालबंदापासून, शिंगे घोळणारे, ग्रामीण कारागीर जगतातच पण शर्यतीच्या आणि जत्राखेत्राच्या निमित्ताने तमाशा कलावत, वाजंत्री, फेरीवाले यांच्याही उपजीविका भागवल्या जातात. बैलबाजाराच्या निमित्ताने बैलाच्या खरेदी विक्रीतून लाखोंच्या उलाढाली होतात. कोल्हापुरातील वडगाव, सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा, सातारामधील म्हसवड पुसेगाव सांगलीतील खरसुंडी या ठिकाणी बैलाचे मोठे बाजार भरतात.
पश्चिम महाराष्ट्रातील खिलार ही बैलाची प्रजात अत्यंत चपळ समजली जाते..ही प्रजात शर्यत आणि बैलबाजारामुळे टिकून आहे. तिची पहिली पैदास औंध संस्थानात झाली.
पुरातन काळात पशुधन होतं..आणि ते उपजीविकेचं मूळ साधन होतं याचे कितीतरी पुरावे आहेत..गोपाळ कृष्ण हे पशूपालक म्हणूनच ओळखले जायचे. नंदी बैल शंकराचं वाहन होतं, त्याअर्थी भगवान शंकर पशूपालक होते. गळ्यात नाग, अंगावर व्याघ्राची वल्कले..रुद्राक्ष माळा ही बैरागी भटक्या पशूपालकाची सगळी चिन्ह सांब सदाशिवात मिळतात.
वसूबारस, बैलपोळा हे सण आदीम काळापासून साजरे होत असल्याची उदाहरणे आहेत.
ऋग्वेदातील कृषीसूक्तात सितेला नांगरलेल्या भूमीची उपमा दिली आहे. ‘बैल आनंदाने, लोक मजेने आणि नांगर सहजतेने जमीन नांगरो असे उल्लेख या सूक्तात आढळतात.
लोकसाहित्यातला बैल हा असाच आहे तुकारामादी संतांनी बैलाला बेफाम कष्टाचं आणि सहनशीलतेच प्रतीक म्हणून आपल्या अभंगात योजला आहे. तुकाराम स्वतः शेती करत.आपल्या अभंगात बैलाच्या वेदनेशी समरूप होवून संत तुकाराम लिहितात.
साकरेची गोणी बैलाचीया पाटी |
तयाशी शेवटी करबाडे||
साखरेची गोणी वाहणारा बैल असला तरी त्याला वाळका कडबाच खायला मिळतो.. श्रमिकांच्या मूक वेदनेच अस्तर घेवून बैलाच्या प्रतिकात तुकोबाचे अभंग अवतरतात..
कवयित्री बहिणाबाई पोळा सणाचा गोडवा गातानाच आपल्या वर्हाडी भाषेत,
नका हेंडालू बैलाले,
माझं ऐका रे जरासं,
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास
असे सावध ही करतात..
कवी यशवंत ही आधी पोळ्याचे गोडवे गाता गाता नंतर अंतर्मुख करतात.
झूलीच्या खालती काय नसतील आसुडांचे वळ उठलेले..
आणि फुटतील उद्याही कडाड.. ऐसेच आसूड पाठीवर
मराठी साहित्यात कृषीवल जाणीवेचा सशक्त आविष्कार करणारे कवी विठ्ठल वाघ परपरेहून निराळी कविता लिहितात...काया मातीत तिफण चालवताना त्यांना नंदीबैलाच्या जोडीला सांब सदाशीव दिसतो तर मागं वटी घेवून परबती दिसते. चलता चालता काटा जेव्हा पायात रुततो लाल रक्तात हिरवं स्वप्न कवीला दिसतं.
शेतीमातीशी एकजीव झालेले कवी इंद्रजीत भालेराव वृषभ कुळातील अगदी छोट्या वासराचं अप्रूप सांगताना लिहितात,
वासराने माझ्या हुंगले आभाळ..
आणि धरणीही कापे चळचळ
आणि दुसरीकडे माणूस आणि प्राणी यांच्या व्यावहारीक संबंधांचा दाखला देताना- बैल वाकडा तिकडा चालला की ईकायचा आन, गडी वाकडातिकडा चालला की हाकायचा हे ही नमूद करायला विसरत नाहीत.
बैलाचे ऋण या आपल्या कवितेत श्री.दी.इनामदार बैलाच्या उत्तरआयुष्याविषयी बैलाचच मनोगत लिहितात,
तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात ,
नको करू हेटाळणी आता उतार वयात
नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर
नको बोलूस वंगाळ, नको म्हणूस डंगर
बैल असा काबाड कष्टाचा आणि करूणेचा अंत: स्वर घेवून साहित्यात अवतरतो..आयुष्यभर ढोर मेहनत केलेल्या बैलाच्या आयुष्यात त्याच्या उतारकाळात अनेकदा अवहेलना येते..औतकाठीला नीट चालेनासा झाला की त्याला बाजार दाखवला जातो....काही निबर कातडीचे धंदेवाईक शेतकरी बैलाला कसायाला देतात.. भालचंद्र नेमाडे आपल्या कवितेत चक्क कत्तलखाण्याचे आणि तेथील लोकांचे यांत्रीक आणि भावनाविहीन आयुष्य चितारतात..
काहीवर्षापूर्वी गोवंश हत्याबंदी कायदा आला. मात्र एकोणीसाव्या शतकात महात्मा फुलेंनी बैलाच्या कतलीसाठी संरक्षण करणारा कायदा असावा असं प्रतिपादन केलं होतं. फुलेंनी ‘आपल्या शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकाची गावोगावी पारायण केली होती.
बैल साहित्यात, कवितेत अतिशय सशक्तपणे आला आहे.. कवी विठ्ठल वाघ बैलाला भूदेवाची उपमा देतात ते उगाच नाही. त्यांच्या वृषभसूक्त काव्यसंग्रहातील कवितेतील या चार ओळी या उपमेला किती समर्पक आहेत हे त्यांच्याच शब्दात..
बैल चंद्राचा वंशज ,
बैल सूर्याचा वारस
बैल माझ्या गोठ्यातील,
पिढ्या पिढ्याचा प्रकाश..
निलेश महिगावकर
25/07/2026
आता क्षितिजावर आपले असंख्य सूर्य तळपत आहेत
आठवे विद्रोही साहित्यसंमेलन
अध्यक्षीय भाषण (डॉ. आ. ह. साळुंखे)
२८-२९ जानेवारी ,२००६, सोलापूर
माझ्या भावंडांनो,
मानवी जीवन अतिशय सुंदर आणि मधुर आहे. हे जीवन साहित्याच्या द्वारे अधिक सुंदर आणि अधिक मधुर कसं बनवावं याविषयी सामूहिक चिंतन करण्यासाठी आपण या विद्रोही साहित्य संमेलनाचं निमित्त करून एकत्र जमलो आहोत. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श, हुतात्म्यांचा त्याग, वारकर्यांची डोळस श्रद्धा, बुद्ध-महावीर यांच्या वाटेवरील पथिकांचा प्रवास, ख्रिस्त-पैगंबर-नानक यांचे अनुसरण, महात्मा बसवेश्वरांच्या प्रेरणा, शेतकऱ्यांचा घाम, सर्व कष्टकर्यांचे-कामगारांचे श्रम, जन्मजात गुन्हेगारी लादलेल्या कलंकाचे निवारण, छोट्या-मोठ्या उद्योगांची उत्पादनं, व्यापार्यांचा सहभाग, समाजाच्या विविध स्तरांतील लोकांचं एकत्रित वास्तव्य, प्रगल्भ अभ्यासकांच्या आणि सहृदय रसिकांच्या सद्भावना, अशा असंख्य गोष्टींची गुंफण झालेल्या परिसराचे आणि जिल्ह्याचं केंद्र असलेल्या सोलापूरासारख्या बहु-आयामी शहरात आपण हे संमेलन घेत आहोत, ही असंख्य लोकांना एकमेकांशी जोडण्याची मोठी संधी आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याशी साहित्याविषयी आणि चळवळीविषयीही काही संवाद साधण्याची संधी मला मिळत आहे. हा माझा मोठा गौरव आहे. असं मला वाटतं. या गौरवाबद्दल मी या संमेलनाच्या संयोजकांचा, संमेलन पार पाडण्यासाठी धडपडणार्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आपणा सर्वांचा अत्यंत कृतज्ञ आहे.
विद्रोह हे संवेदनेचं अपत्य
आपल्या अवती-भोवती जे अस्तित्वात आहे, घडत आहे वा आपल्याला भिडत आहे, त्याची संवेदना होणं, हे सर्व सजीवांचं एक स्वभाव-वैशिष्ट्य आहे. भारतीय समाजात मात्र हजारों वर्ष रुजलेल्या घातक शोषणव्यवस्थेनं येथील सर्वसामान्य लोकांचा हा स्वभाव मोठ्या प्रमाणात खच्ची तरी केला वा मारला देखील. त्यामुळं संवेदना अनुभवण्याचं त्यांचं सामर्थ्य बोथट तरी झालं वा नष्टही झालं. पुरेशा संवेदनाच नसल्यामुळं संवेदना अनुभवल्यानंतर दिला जाणारा प्रतिसाद वा व्यक्त केली जाणारी प्रतिक्रियाही पाहिजे तितकी निर्माण झाली नाही. अशाही स्थितीत काही जागरूक व्यक्तींनी व्यवस्थेचे घाव पचवूनही संवेदना अनुभवण्याचे आपलं सामर्थ्य चिवटपणानं जपलं, आपल्या हृदयाची स्पंदनं मंदावू दिली नाहीत, मस्तकातील विचारलहरी मावळू दिल्या नाहीत. अशा संवेदनशील लोकांनी त्या व्यवस्थेची दडपणं झुगारून देण्यासाठी जो संघर्ष केला, तोच विद्रोह होय. याचा अर्थ विद्रोह हे संवेदनेचं देखणं अपत्य आहे. इथे जमलेले आपण सर्वजण महान आणि प्रदीर्घ अशा भारतीय विद्रोहाचे वारसदार आहोत, ही आपल्या स्वत:च्या दृष्टीनं देखील अभिमानास्पद गोष्ट आहे.
आता आपण कोणाचे नुसते प्रतिध्वनी वा प्रतिबिंब नाही
हजारो वर्ष इथल्या बहुजन समाजाची आणि बहुतेक स्त्रियांची स्थिती ज्ञानेंद्रिय असून ज्ञानेंद्रियं नसल्यासारखी,जीभ असून जीभ नसल्यासारखी होती. त्यांना जणू काही स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. ते दुसर्या कोणाची तरी निव्वळ सावली होते. आता मात्र आपल्यामधील जाणिवांची सर्व केंद्र जागृत आणि क्रियाशील झाली आहेत. आता आपण दुसर्या कोणाच्या ध्वनीचे नुसते प्रतिध्वनी नाही. आता आपण दुसर्या कोणाचं नुसतं प्रतिबिंब होण्याचं नाकारत आहोत. इतरांकडून घेता येण्यासारखं असेल, ते आपण जरूर घेऊ. परंतु आपल्या जीवनाला गुलामगिरीचे डाग मात्र कदापि लागू देणार नाही.
आपला विद्रोह हा एक आपद्धर्म
साहित्याची निर्मिती ‘स्वान्तःसुखाय’ म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी व्हावी, हे तत्त्वतः ठीक आहे. पण, व्यवहारामधे समाजातील असंख्य जनसमूह आनंद देण्याघेण्याच्या स्थितीत नसतीलच, तर त्यांच्या जीवनात तशी स्थिती आणण्याकरिता प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणं अपरिहार्य होऊन बसतं. आपल्या समाजाची रचना नेमकी अशीच आहे. स्वाभाविकच, आपला विद्रोह हा एक प्रकारे आपद्धर्म आहे, आपला नित्यधर्म वा प्रकृतिधर्म नव्हे; तो एक संचारी भाव आहे, आपला स्वभाव वा स्थायी भाव नव्हे. समाजव्यवस्थेतील विषमतेनं आपला आत्माविष्कार कुंठित केल्यामुळे आपल्याला नाइलाजानं हा मार्ग स्वीकारावा लागला आहे. ज्या क्षणी आपल्या आत्माविष्कारावर बाहेरून लादण्यात आलेली विघातक बंधनं आणि दडपणं आपल्या विद्रोहामुळं गळून पडतील, त्या क्षणी आपण आपोआपच विद्रोहाच्या पलीकडं गेलेले असू! आपण काही सुखासुखी विद्रोह करीत नाही. काही झालं तरी विद्रोह यातना देतो, यात शंका नाही आणि असं असूनही आपण अत्यंत निर्धारानं विद्रोहाची घोषणा करीत आहोत. कारण, गुलामगिरीनं निःसत्त्व केलेलं मृतप्राय जीवन जगण्यापेक्षा आपल्या स्वत्वासाठी आणि स्वातंत्र्यासाठी विद्रोहाच्या यातना सोसणं हे खऱ्या जिवंतपणाचं लक्षण आणि सच्च्या माणूसपणाचं भूषण आहे, अशी आपली सर्वांची भावना आहे.
पंखांवरची बंधनं तटतटा तोडण्यासाठी विद्रोह
हजारो वर्ष आपल्याला पंख आहेत. पंखांमधे आकाशात झेपावण्याचं बळ आहे. झेपावण्यासाठी समोर विशाल आकाश खुलंही आहे. पण कोणी तरी आपले पंख करकचून घट्ट बांधून ठेवले आहेत. आपल्याला आकाशात झेपावण्याला सक्त मनाई आहे. अशा स्थितीत, आपला विद्रोह कशासाठी आहे, त्याचं साधं, सरळ उत्तर आहे - आपल्या पंखांवरची बंधनं तटतटा तोडून टाकण्यासाठी आणि विशाल आकाशात मुक्तपणानं संचार करण्यासाठी आपला विद्रोह आहे: दुसऱ्या कोणाचे, अगदी आपले पंख बांधणाऱ्यांचेही, पंख जखडून ठेवणं, हा आपल्या विद्रोहाचा हेतू नाही. आपला विद्रोह इतरांच्या स्वातंत्र्यावर, न्याय्य अधिकारांवर अतिक्रमण करण्याइतका आक्रमक आणि अनैतिक असणार नाही. पण त्याबरोबरच आपला संयम इतरांनी केलेल्या अन्यायापुढे झुकण्याइतका लाचार आणि निःसत्त्वही असणार नाही.
विद्रोह हा द्रोह नव्हे, तर स्वद्रोहातून मुक्त होण्याचा प्रवास
काही हितसंबंधी लोक विद्रोहाचं द्रोहाशी समीकरण करून विद्रोहाला बदनाम करीत असतात. खरं तर विद्रोह हा द्रोह नव्हे. उलट, तो स्वद्रोहातून मुक्त होण्याचा प्रवास आहे. ते स्वजननिष्ठा जागृत झाल्यानंतर आपल्या शोषणकर्त्यांना नाइलाजानं दिलेलं जबरदस्त आव्हान आहे. ती स्वजनद्रोही वर्तनातून स्वतंत्र होण्यासाठी केलेली उमदी जीवनयात्रा आहे.
नकाराची चटक नको, निर्मितीसाठी सरसावणं हवं
आपल्यावर बाहेरून लादण्यात आलेली बंधनं नाकारणं, हा आपल्या विद्रोहाचा एक महत्त्वाचा आणि अपरिहार्य भाग आहे, यात शंका नाही. जी बंधनं आपल्याला फुलून येण्याऐवजी मिटूनच रहायला भाग पाडतात, ती बंधनं तोडलीच पाहिजेत. परंतु या संदर्भात सावधगिरीचा एक इशारा इथंच देऊन ठेवणं आवश्यक आहे, असं मला गंभीरपणानं वाटतं.अनिष्ट घटकांचा नकार करता करता आपण नकाराच्या प्रेमात पडण्याचा, त्याच्या भोवतीच घुटमळत राहण्याचा धोका असतो. नकाराची चव चाखल्यावर त्याची चटक लागण्याचा, त्याचं व्यसन जडण्याचा धोका संभवतो. इथंच फार फार सावध राहणं महत्त्वाचं असतं. आपल्याला नकाराजवळ थांबायचं नाही, नवनिर्मितीच्या दिशेनं झेप घ्यायची आहे. याचा विसर पडला, तर सारा विद्रोह वाया जाऊ शकतो. नवनिर्मितीसाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार करणं, हे नकाराचं काम आहे. म्हणूनच, अनिष्टाचा नकार करून तृप्त होणं आणि थांबणं, हे आपल्या विद्रोहाचं स्वरूप नाही. नकाराच्या पुढे जाऊन निर्मितीसाठी सरसावणं आणि त्यानंतर आपल्याला आनंदरसात चिंब करून टाकणारी निर्मिती प्रत्यक्ष घडवणं, यात आपल्या विद्रोहाचं खरं साफल्य आहे.
विद्रोहामधे नव्या समाजरचनेचं नियोजन हवं
विद्रोह अपरिहार्य असला, तरी विद्रोहाच्या बाबतीत आपण आणखी काही पथ्य पाळणं हे मात्र अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थापरिवर्तन हे आपल्या विद्रोहाचं उद्दिष्ट आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. स्वाभाविकच, आपल्या विद्रोहामधे नव्या समाजरचनेचं नियोजन हवं; क्रोधाचं वा संतापाचं केवळ विरेचन असं त्याचं स्वरूप असता कामा नये. तसंच, विद्रोहाचा आविष्कार त्याच्या उद्दिष्टाला साजेसाच हवा, त्याच्या विरोधी तर नकोच नको.
निरंतर विद्रोहाद्वारे होणाऱ्या उत्क्रांतीमधून क्रांती घडेल
विद्रोह ही क्षणिक, तात्कालिक वा एखाद-दुसऱ्या पिढीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही. हजारो वर्षांची पुटं सहजासहजी दूर होण्याची शक्यता नाही. आपल्याला सध्याच्या क्लेशकारक समाजव्यवस्थेमधे परिवर्तन करायचं आहे. हे परिवर्तन क्रांतीच्या स्वरूपात घडून यावं, असा उत्साह, उत्कंठा आणि उतावीळपणाही आपल्या मनात असतो. परंतु क्रांती काही पुनःपुन्हा घडत नसते, दररोज घडत नसते. सामाजिक इतिहासात फार फार क्वचित घडणारी अशी ती दुर्मिळ घटना आहे. पण म्हणून काही आपण क्रांतीची वाट बघत निष्क्रिय राहून गप्प बसू शकत नाही. परिवर्तनाची प्रक्रिया थांबवू शकत नाही. कणाकणानं पुढे सरकवणारी उत्क्रांती उपेक्षू शकत नाही. हे कितीही दुःखद वाटत असलं, तरी हे कठोर वास्तव स्वीकारण्याखेरीज गत्यंतर नाही. या वास्तवाला स्वीकारून पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे निरंतर चालणारा विद्रोह होय. या निरंतरच्या विद्रोहामुळं क्षणाक्षणाला उत्क्रांती घडत राहील आणि उत्क्रांतीनं होणारा प्रवासही थोडाथोडका आणि कमी महत्त्वाचा नसेल. उत्क्रांतीची पावलं टाकत टाकत आपण आपल्या ध्येयाच्या दिशेनं एक दिवस इतक्या दूरपर्यंत पोचलेले असू, की तिधून प्रवासाच्या प्रारंभापर्यंत नजर टाकली, तर क्रांती घडून आल्याचंच आपल्याला जाणवेल.
*दलित मुलीचा सायकलवरून महाविद्यालयाला जाण्याचा विद्रोह*
एका छोट्याशा उदाहरणावरून हे स्पष्ट होईल, असं मला वाटतं. काही महिन्यांपूर्वी ओरिसातील एका दलित मुलीची माहिती प्रसिद्ध झाली होती. या मुलीचं गाव भुवनेश्वरपासून सात-आठ किलोमीटरवर आहे. त्या गावातील दलित समाजातून एस.एस.सी. झालेली ती पहिली मुलगी होय. तिच्या या शिक्षणामुळे तिच्या गावात एक वादळ निर्माण झालं. त्यातच ती महाविद्यालयीन शिक्षणासाठी भुवनेश्वरला जाऊ लागली. एवढंच नाही, तर ती महाविद्यालयाकडचा प्रवास सायकलवरून करू लागली. जुन्या विचारांच्या प्रस्थापित लोकांनी तिच्या शिक्षणाला आणि सायकलवरून जाण्याला जोरदार विरोध केला. तिच्यावर आणि तिच्या वडिलांवर दडपण आणण्यात आलं. तिनं सायकलवरून जाण्याचं थांबवलं नाही, तर बहिष्कार घालण्याची धमकी देण्यात आली. बहुधा बहिष्कार टाकण्यातही आला. पण तिनं आपला निर्धार सोडला नाही. सायकलवरून जाणं आणि शिक्षण चालू ठेवणं, याबाबतीत ती ठाम राहिली. आता ती पोलीस संरक्षणात आपला प्रवास करीत असते. आपलं शिक्षण पूर्ण करून शिक्षिका व्हायचं आणि आपल्यासारख्या मुलींना शिकवायचं, असा तिचा ध्यास आहे.
एखाद्या मुलीला सायकल वापरण्यासारख्या अगदी साध्या गोष्टीसाठी इतका संघर्ष करायला लागावा, हे आपल्या समाजाला खरोखरच लाजिरवाणं आहे. पण दुसऱ्या बाजूला या मुलीचा व्यवस्थेच्या विरोधातील विद्रोह अभिमानास्पद आणि अक्षरशः रोमांचक आहे. वरवर दिसणारे हे छोटे छोटे विद्रोह एका महान क्रांतीची वाट प्रशस्त करीत आहेत, याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही.
परिवर्तनाचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करू या
या संदर्भात मला आणखी एक महत्वाची गोष्ट अत्यंत आग्रहानं नोंदवायची आहे. आपण व्यवस्थापरिवर्तनाचा ध्यास तर घेतला आहे. हा ध्यास आपल्या माणूसपणावरचे गुलामगिरीचे डाग दूर करणारा आहे आणि ही घटना फार आनंदाची आहे. असं असूनही, केवळ ध्यास घेतला म्हणजे तो सहजासहजी सफल होतो असं नाही, हे मात्र आपण विसरता कामा नये. माझं तरी म्हणणं असं आहे, की आपण परिवर्तनाचा एक शास्त्र म्हणून सर्व अंगांनी पद्धतशीर अभ्यास केला पाहिजे. हजारो वर्ष चळवळी करूनही आपल्याला हवं असलेलं परिवर्तन पुरेशा प्रमाणात अजून का घडलेलं नाही, याचा वस्तुनिष्ठ शोध घेणं, ही आपली जबाबदारी आहे, असे मला वाटतं. परिवर्तनाला मंद करणार्या वा रोखून धरणाऱ्या बाबी कोणत्या, ते डोळसपणे पहायला हवं. आपल्या शत्रूची बलस्थानं कोणती आहेत हे शोधलं पाहिजे. आपण कुठं चुकतो वा कमी पडतो, याविषयी आत्मनिरीक्षण करायला हवं. थोडक्यात म्हणजे ‘परिवर्तन घडेल’ असं स्वप्न नुसत्या भावडेपणानं न पाहता परिवर्तन घडविण्याची अचूक आणि शास्त्रशुद्ध पद्धत वापरून आत्मविश्वासानं आणि निःसंदिग्धपणानं परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग आपण स्वीकारायला हवा.
विद्रोहाची निरंतरता व्यंग्यार्थानं घ्यायची
मी विद्रोहाच्या निरंतरतेविषयी जे बोललो, त्याविषयी एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. निरंतर विद्रोह करणं याचा अर्थ विद्रोही साहित्यिक २४ तास आणि ३६५ दिवस फक्त विद्रोहीच असतो वा त्यानं तसंच असावं, असं अजिबात नाही. त्याच्या जीवनातही आणि साहित्यातही निसर्ग, प्रेम, वात्सल्य अशा अनेक गोष्टी यथोचित स्वरूपात आणि प्रमाणात असायलाच हव्यात. अर्थात, आपापल्या आवडीनिवडीनुसार, हे तर उघडच आहे. शिवाय, या सगळ्यांनाही विद्रोहातून निर्माण झालेल्या समता, न्याय यांसारख्या मूल्यांचं आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अधिष्ठान असू शकतं. असं असलं तरी विद्रोहाचा अजिबात स्पर्श नसलेल्या घटनाही विद्रोही साहित्यिकाच्या जीवनात आणि साहित्यात असू शकतात, हे विसरता कामा नये. अशा स्थितीत विद्रोहाच्या निरंतरतेचा अर्थ इतकाच, की समाजव्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी जो विद्रोह करायचा, तो कमालीच्या चिकाटीनं दीर्घकाळ करणं आवश्यक असतं. कदाचित हा विद्रोह पिढ्यानपिढ्या करीत राहणंही गरजेचं असतं. अपयश आलं, तरी वैफल्यग्रस्त न होता आपल्या उद्दिष्टप्राप्तीसाठी दृढनिश्चयी वृत्तीनं, जागरूकपणानं काम करीत राहणं अपेक्षित असतं. थोडक्यात म्हणजे निरंतरता हा शब्द वाच्यार्थानं न घेता व्यंग्यार्थानं घेणं महत्त्वाचं आहे.
विद्रोही कार्यकर्ते आणि विद्रोही साहित्यिक यांचं नातं अतूट आणि विश्वासाचं हवं
परिवर्तनाच्या चळवळीत काम करताना अनेकदा अनेक व्यक्तींवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पडतात. त्यामुळे अनेकदा जो विद्रोही कार्यकर्ता तोच विद्रोही साहित्यिक आणि जो विद्रोही साहित्यिक तोच विद्रोही कार्यकर्ता, अशी स्थिती असते. साहित्य आणि चळवळ एकमेकांना पूरक असल्यामुळे काही प्रमाणात असं घडणं अटळही आहे. तरीदेखील, आपण जसजसे पुढे सरकू, तसतशी या दोघांच्या कार्यक्षेत्रांची योग्य स्वरूपात विभागणी व्हायला हवी. त्यांनी एकमेकांना पूरक राहूनच, पण कामाची काही वाटणी करून घेणं आवश्यक आहे. ज्यांना दोन्ही गोष्टी उत्तम रीतीनं पेलतील, त्यांनी त्या जरूर पेलाव्यात. पण ज्यांची तारांबळ होईल, ओढाताण होईल, ज्यांना दोन्ही गोष्टी पेलण्याचा ताण जाणवेल, त्यांनी दोहोपैकी एकाच गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करावं. हे करीत असताना साहित्यिक आणि कार्यकर्ता यांच्यामधे कमालीच्या विश्वासाचं, सहकार्याचं, संवादाचं, वैचारिक देवघेवीचं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बरोबरीचं अतूट नातं असावं. साहित्यिकानं चळवळीला आशय, आविष्कार, दिशा, भूमिका आणि तत्त्वज्ञान द्यावं, पण या सगळ्याचा अहंकार बाळगू नये. आपला विचार कितीही महान असला, तरी तो लोकांच्या हृदयापर्यंत आणि मस्तकापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्ताच करीत असतो, हे त्यानं विसरू नये. कार्यकर्ता नसेल, तर साहित्यिकाचा विचार त्याच्याच देहात विरून आणि जिरून जाईल, यात शंका नाही. दुसऱ्या बाजूनं कार्यकत्यांनंही असाच परस्पर पूरकतेचा विचार करावा. आपण कितीही ऊर्जा घेऊन चळवळ उभी करीत असलो, तरी चळवळीला तत्वज्ञानाचा, दृष्टिकोणाचा जीवनरस पुरविण्याच्या बाबतीत साहित्यिकाचं सहकार्य घेणं आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी उपयुक्त आहे, हे त्यानं विसरू नये.
व्यक्तीपेक्षा चळवळ मोठी मानू या
बहुजन समाजाच्या विविध चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांनी परस्परसंबंधांच्या बाबतीत तत्त्वाधिष्ठित आणि तरीही लवचिक अशी काही आचारसंहिता निश्चित केली, तर चळवळी अधिक नेमकेपणानं आणि प्रभावीपणानं कार्य करतील, असं मला वाटतं. याबाबतीत नमुना म्हणून केवळ एखाद-दुसऱ्या गोष्टीचा निर्देश करतो. जेव्हा चळवळीपेक्षा व्यक्ती मोठ्या मानल्या जाऊ लागतात आणि चळवळीच्या उद्दिष्टांपेक्षा काही व्यक्तींचे आग्रह म्हणा वा अहंकार म्हणा महत्त्वाचे ठरू लागतात, तेव्हा चळवळी अर्थहीन बनतात, हे आपण विसरता कामा नये. इतिहासाच्या पानांवर चळवळीचा ठसा उमटला, तरच कार्यकर्त्यांचंही नाव तिथं नोंदवलं जाणार. याउलट, चळवळच पराभूत, निष्प्रभ आणि विस्मृत झाली, तर काही काळ झळकणाऱ्या कार्यकर्त्यांचीही इतिहासाच्या पानावर नामोनिशाणी शिल्लक राहणार नाही, हे उघड आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि विकासाचा आदर जरूर करायचा, व्यक्तीला दडपून वा चिरडून टाकायचं नाही, हे तर खरंच, परंतु दुसरीकडें आपल्या समाजाच्या व्यापक कल्याणासाठी आपण व्यक्तीपेक्षा चळवळ मोठी, चळवळीपेक्षा समाज मोठा आणि एका काळातील समाजापेक्षा अनेक पिढ्यांचा समाजप्रवाह मोठा मानला पाहिजे. हे बंधन स्वतः मलाही लागू आहे, असं मी मानतो. आपण आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या उद्दिष्टावर केंद्रित केलं, तर हे बंधन जाचक तर वाटणार नाहीच, पण तो आपला सहज स्वभाव बनून आपल्या उद्दिष्टाच्या पूर्तीला पूरक ठरेल, यात शंका नाही. गैरसमज, अज्ञान, परिस्थितीच्या आकलनाचा अभाव, अहंकार, मत्सर यांसारख्या एका वा अनेक कारणांमुळे आपल्या समविचारी व्यक्तींवर जाहीररीत्या हल्ला केल्यास आपल्या चळवळीचं विचारशस्त्रबोथट बनतं, आपली चळवळ क्षीण होते आणि शत्रूचें फावतं, हे विसरता कामा नये. म्हणूनच, आपापसांतील मतभेद व्यक्त करण्याच्या संदर्भात आपण काही शास्त्रशुद्ध पद्धत निश्चित करणं गरजेचं आहे. हा माझा आक्षेप वा उपदेश आहे, असं कृपया कोणीही समजू नये. माझी ही तुम्हा सर्वांना अगदी काळजाच्या देठापासूनची हाक आहे, एवढंच मी म्हणू शकतो.
परिवर्तनवादी चळवळीचे नेते आणि अनुयायी यांच्या परस्परसंबंधांनाही हेच लागू आहे. चळवळ उभारणारा कार्यकर्ता वा नेता स्वयंप्रेरणेनं, उपक्रमशील वृत्तीनं, अनेक प्रकारचा त्याग करून आणि धोके पत्करून काही घडवत असतो. याचं श्रेय त्याला द्यायलाच हवं. पण त्याचा अनुयायांबरोबरचा मनमोकळा संवाद खुंटला वा तुटला, तर त्याचा तो सर्व त्याग वाया जाण्याचा धोका असतो. म्हणून, आपले अनुयायी आपल्या भावभावना मोकळेपणानं व्यक्त करू शकतील, इतकं खुलं वातावरण त्यानं निर्माण करावं आणि अनुयायांनीही त्याच्या त्यागाचं आणि कर्तृत्वाचं दडपण न घेता आपल्या शंका, मतं वा मतभेदही त्याच्यापुढं नम्रपणानं मांडण्याइतकं धैर्यशील व्हावं. समाजाच्या व्यापक हितासाठी हे अत्यावश्यक आहे.
प्रमाण भाषेच्या ढाच्यामधे बदल करणं आवश्यक
आपल्या मुलामुलींचा भाषिक-साहित्यिक आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर आपल्याला आपल्या भाषेतील छोट्या-छोट्या शब्दांपासून, म्हणी-वाक्प्रचार यांच्यापासून ते प्रमाण भाषेच्या एकूण ढाच्यापर्यंत अनेक बाबींचा बारकाईनं आणि गंभीरपणानं विचार करणं आणि त्यामधे योग्य ते बदल करणं आवश्यक आहे.
मराठी विषयात इतकी मुलं अनुत्तीर्ण का होतात ?
एका उदाहरणानं ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल, असं मला वाटतं. एस.एस.सी.परीक्षेत मराठी विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या मुलामुलींची संख्या फार प्रचंड आहे, अशी बातमी आपण वाचलेली-ऐकलेली असते. मराठी ही या मुलांची ‘मातृभाषा’ आहे, असं आपल्याला वाटत असतं. ती त्यांची मातृभाषा आहे, याचा एक अर्थ गणित, विज्ञान, इंग्रजी इ. विषयांच्या तुलनेत ती त्या मुलांना खूप आधी मिळाली आहे. म्हणजेच ती अधिक मूलभूत आहे, त्यांच्या मनात अधिक खोलवर रूजलेली आहे. स्वाभाविकच, त्यांनी त्या विषयात सहजपणे उत्तीर्ण व्हायला हवं. प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही. यामागचं कारण काय, ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मराठी ही मातृभाषा असल्यामुळे तो विषय सोपा समजून त्याच्या अभ्यासाकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही आणि म्हणून मुलं त्या विषयात अनुत्तीर्ण होतात, असं एक कारण सांगितलं जातं. त्यात थोडाबहुत तथ्यांश आहे, हे खरं आहे. परंतु ही कारणमीमांसा अगदी जुजबी आणि वरवरची आहे. या घटनेकडं आपण एका फार वेगळ्या आणि अधिक मूलगामी दृष्टीनं पाहण्याची गरज आहे.
प्रस्थापित मुलांची आणि बहुजन मुलांची मातृभाषा वेगळी
बहुजन समाजातील मुलांना ज्या प्रमाण भाषेत उत्तरं लिहावी लागतात, ती त्या मुलांची खरी मातृभाषा नसते, ही त्यांच्यापुढची एक फार महत्त्वाची अडचण आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील मुलं त्यांची भाषा त्यांच्या आईकडून आणि निकट संपर्कातील इतरांकडून शिकतात, तर बहुजन समाजातील मुलं त्यांची भाषा त्यांच्या आईकडून आणि इतरांकडून शिकतात. या दोन भाषांत काही घटक समान असले, तरी असंख्य गोष्टी वेगळ्या असतात. एक प्रकारे, समान दिसणाऱ्या अशा त्या दोन वेगवेगळ्या भाषा असतात, असंही म्हणणं शक्य आहे. परीक्षेत उत्तरं देताना मात्र एक चमत्कारिक गोष्ट घडते. प्रस्थापित मुलाची मातृभाषा हीच त्याची प्रमाण भाषा असते. त्यामुळे त्याला मातृभाषेखेरीज वेगळी अशी प्रमाण भाषा आत्मसात करावी लागत नाही. त्यानं त्या भाषेत लिहिलेले शब्द शुद्ध मानले जातात. बहुजन समाजातील मुलाची स्थिती मात्र नेमकी त्याच्या उलटी असते. त्यानं आपल्या मातृभाषेत लिहिलेले शब्द अशुद्ध मानले जातात. त्याला गुण मिळवायचे असतील, तर आपल्या मातृभाषेतील लहानपणापासून मनात रूजलेले आणि जिभेवर रूळलेले शब्द वाजूला सारून वेगळे शब्द आत्मसात करावे लागतात. प्रस्थापित व्यवस्थेतील मुलानं ‘खूप’ वगैरेसारखे स्वतःच्या मातृभाषेतील शब्द वापरले की त्याला दहापैकी दहा गुण मिळतात आणि बहुजनातील मुलानं ‘लई’ वगैरेसारखे शब्द वापरले की त्याला शून्य गुण मिळतात. दोघेही आपापल्या मातृभाषेतील शब्द वापरतात आणि तरीही एकाकडं सर्वोच्च गुणवत्ता आहे असं मानलं जातं आणि दुसऱ्याकडं गुणवत्तेचा पार अभाव आहे असं मानलं जातं. गुणवत्ता ठरविण्याची ही कसोटी पक्षपाती आणि अन्यायाची तर आहेच. पण बहुजन समाजातील मुलांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करणारी आहे. त्यांच्या मनात केवळ मराठी भाषेविषयीच नव्हे, तर एकूण सर्वच विषयांबद्दल न्यूनगंड निर्माण करणारी आहे.
*केवळ वेगळी नव्हे, तर प्रत्यक्ष शोषणकर्त्यांचीच भाषा वापरावी लागते*
या प्रक्रियेमधील धोके खरं तर यापेक्षाही फार मोठे आहेत. या मुलांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक वेगळी भाषा शिकावी लागते, एवढीच ही स्थिती नाही. त्यांना प्रत्यक्षरीत्या त्यांच्या शोषणकर्त्यांची भाषा वापरूनच आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. एकदा का ती भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया सुरू झाली, की ती केवळ भाषेच्या स्वीकारापुरती मर्यादित रहात नाही. प्रस्थापित व्यवस्थेतील जीवनमूल्यं, श्रेष्ठ-कनिष्ठतेचे निकष, सांस्कृतिक दृष्टिकोण, किंबहुना एकूणच आचार- विचार हे त्यांना प्रमाण, आदर्श आणि अनुकरणीय वाटू लागतात. थोडक्यात म्हणजे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अनेक अंगांनी स्वतःला गुलाम बनवून घ्यावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेत त्यांना आपली गुणवत्ता सहजपणे सिद्ध करता येत नाही आणि त्यांच्या स्वत्वावरही डाग लागतात, ही फार क्लेशकारक बाब आहे.
शब्द-शब्द वेचून घेऊ या, प्रमाण भाषेत अधिकृत बनवू या
आपल्याला जर आपलं सांस्कृतिक स्वातंत्र्य सिद्ध करायचं असेल आणि आपल्या गुणवत्तेच्या विकासाचा मार्ग खुला करायचा असेल, तर याबाबतीत आपल्याला आपल्या शक्तीनिशी काही महत्त्वाची पावलं उचलावी लागतील. अलीकडं आपण ‘व्यासपीठ’ या शब्दाऐवजी ‘विचारपीठ’, ‘व्याख्यानमंच’ यासारखे शब्द रूढ़ केले आहेत. ‘स्वर्गीय’, ‘दिवंगत या शब्दांऐवजी ‘स्मृतिशेष’ हा शब्द रूढ केला आहे. हा एका व्यापक प्रक्रियेचा भागच आहे. याच पद्धतीनं बहुजनांच्या भाषेतील ‘लई’ या शब्दासारखे हजारो शब्द प्रमाण मराठीमध्ये रूढ़ करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. आज हे शब्द कथा-कादंबऱ्यांतून वापरले जातात. पण ते साहित्य ‘ग्रामीण’ वगैरे म्हणून एक प्रकारे अ-प्रमाण ठरवलं जातं. आपला प्रयत्न हे शब्द केवळ कथा-कादंबऱ्यांतून नव्हे तर गंभीर स्वरूपाच्या वैचारिक लेखनातही अधिकृत म्हणून स्वीकारले जावेत, यासाठी असायला हवा. यामुळे प्रमाण भाषेचं नुकसान तर होणार नाहीच; उलट, ती समृद्धच होईल. शिवाय, प्रस्थापित व्यवस्थेतील मुलांवर काही अन्याय होण्याचाही प्रश्न नाही. कारण, त्यांना हवे असलेले शब्द वापरण्याचे त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहीलच. मला स्वतःला माझं वैचारिक वाङ्मय माझ्या ‘मातृभाषेत’ लिहिता आलं नाही, याचे फार क्लेश जाणवले आहेत. पण माझा काही इलाज नव्हता. स्वतःच्या मातृभाषेत लिहिण्याचं पाऊल एकाकीपणानं उचलू शकत नव्हतो. आज आपली सुजाण चळवळ उभी असल्यामुळे आपल्या भाषेला वळण देणं आपल्या आवाक्यात आलं आहे.
संस्कृतबरोबरच प्राकृत भाषांतील शब्द प्रमाण भाषेत यायला हवेत
याच पद्धतीनं, आपल्या प्रमाण भाषेत केवळ संस्कृत तत्सम शब्द वापरण्याऐवजी पाली, अर्धमागधी अशा प्राकृत भाषांतील शब्दही सध्यापेक्षा अधिक प्रमाणात जाणीवपूर्वक स्वीकारणं आपला सांस्कृतिक वारसा सहजपणानं आपल्या रक्तात भिनण्याच्या, मुरण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. एका उदाहरणानं सहज स्पष्ट होईल. संस्कृतमधे ‘धर्म’ असा शब्द आहे. पालीमधे ‘धम्म’ असा शब्द आहे. मराठीनं प्रमाण भाषेत ‘धर्म’ शब्द स्वीकारला, धम्म शब्द स्वीकारला नाही. पण याचा परिणाम केवळ एका शब्दापुरता मर्यादित राहिला नाही. ‘धर्म’ शब्द स्वीकारल्यामुळे आपला समाज वैदिक धर्मग्रंथांशी जोडला गेला. त्या ग्रंथांतून मांडण्यात आलेली विषमतेची आणि स्वातंत्र्य नाकारणारी मूल्यं त्याला वारसारूपानं मिळाली. असं होण्याऐवजी आपल्या प्रमाणभाषेत ‘धम्म’ शब्द स्वीकारला गेला असता, तर आपल्या आचरणातून समता, स्वातंत्र्य, करुणा, विवेक यांसारख्या मूल्यांचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांबरोबरची आपल्या समाजाची नाळ इतकी तुटली नसती. याच पद्धतीनं अर्धमागधीच्या बाबतीत घडलं असतं, तर आपला समाज वैदिक मतांच्या बाबतीत अत्यंत दुराग्रही बनून महावीरांच्या अनेकान्तवादापासून इतका गेला नसता. याबाबतीत इतरही असंख्य मुद्दे आहेत. त्या सर्वांचं विवेचन करण्याचा हा प्रसंग नव्हे. या बाबतीत आपल्याला निर्धारानं काही पावलं उचलावी लागतील. अन्यथा आपल्या मुलांचे भाषिक आणि पर्यायानं सर्वांगीण खच्चीकरण होत राहील, इतकंच या क्षणी मला सुचवायचं आहे. मी स्वतः संस्कृत भाषेचा चाहता आहे आणि तरीही मराठीचं प्रमाण-स्वरूप ठरविताना केवळ संस्कृतवर अवलंबून राहणं बहुजनांच्या विकासाच्या दृष्टीनं घातक आहे, असं मला वाटतं.
समीक्षेच्या क्षेत्राकडं लक्ष हवं
समीक्षेच्या क्षेत्राकडंही आपण अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. कारण, साहित्याच्या सर्व शाखांतील विकासाला हातभार लावण्याचं, दिशा देण्याचं आणि समृद्ध करण्याचं कार्य डोळस, वस्तुनिष्ठ आणि संवेदनशील समीक्षेमुळं घडत असतं.
प्रस्थापित समीक्षा ही तर दुरीक्षा
‘समीक्षा’ (सम्+ईक्षा) शब्दाचा अर्थ ‘सम्यक ईक्षा’ म्हणजे ‘यथोचित दृष्टी’ असा आहे. या अर्थाची कसोटी लावून प्रस्थापित व्यवस्थेतील तथाकथित समीक्षेचं मूल्यमापन केलं, तर काही अपवाद वगळता ती दुरीक्षा’ (दुर+ईक्षा) आहे, असं म्हणणं भाग आहे. दुरीक्षा म्हणजे दूषित, असम्यक, अनुचित दृष्टी होय.
प्रस्थापितांच्या समीक्षेनं आपल्या समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींच्या आत्माविष्काराला पोषक ठरण्याचं कर्तव्य पार पाडलेलं नाही, ही तिच्यातील अत्यंत गंभीर त्रुटी आहे. थोडक्यात सांगायचं, तर ती समीक्षा संकुचित दृष्टिकोणानं कलुषित आणि पक्षपाती भूमिकेनं कलंकित झालेली आहे. प्रस्थापित व्यवस्थेला फितूर न होणाऱ्या साहित्यिकाचे लेखन अनुल्लेखानं मारणं, त्याची उपेक्षा करणं, त्याच्यामधे नसलेले दोष त्याला चिकटवून त्याची निंदानालस्ती वा टवाळी करणं, त्याच्याविषयी अपप्रचाराची मोहीम उघडणं, अशा साहित्यिकाचा तेजोभंग करून त्याचं मानसिक खच्चीकरण करणं, त्याला लोकांपासून तोडून एकाकी पाडणं इ.प्रकारचे प्रस्थापितांचे जे कुत्सित डावपेच आहेत, त्यांच्याविषयी मी प्रस्तुत ठिकाणी नव्यानं आणि विस्तारानं काही बोलण्याची गरज नाही, असं मला वाटतं. कारण, प्रस्थापित समीक्षेतील उणिवा दाखवणं, हा काही समीक्षेचा मुद्दा इथं उपस्थित करण्यामागचा माझा प्रमुख हेतू नाही. उलट, आपण आपलं स्वतंत्र समीक्षाशास्त्र, साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र विकसित करण्याकडे आपलं लक्ष वेधावं, ही माझी खरी भावना आहे.
आपलं स्वतंत्र समीक्षाशास्त्र हेच त्यांना खणखणीत आणि सणसणीत उत्तर
प्रस्थापित समीक्षक आपल्या साहित्याला न्याय देणार नाहीत, हे आपण गृहीतच धरलं पाहिजे. त्यांची ही भूमिका अनैतिक असली, तरी अनपेक्षित नाही. ते स्वतःच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी अनिष्ट पावलं उचलणारच, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपलं साहित्य समृद्ध करण्यासाठी आपण आपल्या क्षमता पणाला लावून आपलं दर्जेदार समीक्षाशास्त्र उभं करणं हेच त्यांच्या पक्षपाताला आपण दिलेलं खणखणीत आणि सणसणीत उत्तर ठरणार आहे, असं मला वाटतं. आपल्या- विषयी मनात दुर्भावना असलेली शेजारची गृहिणी आपल्या घरात स्वयंपाक करून फक्त स्वतःच्या मुलांनाच खाऊ घालते, आम्हांला जेवू घालत नाही. अशी तक्रार करीत बसण्यात अर्थ नाही. खरं तर आपण इतके स्वयंभू आहोत, की आपण आपल्या शेतात स्वतः धान्य पिकवू शकतो आणि आपल्या स्वयंपाकघरात स्वतःचं अन्न शिजवून पोटभर जेवूही शकतो, तृप्त होऊ शकतो. आपण आपली ही क्षमता ओळखणं आणि ती पूर्ण सामर्थ्यानिशी व्यक्त करणं, हेच आता आपल्यापुढचं खरं आव्हान आहे.
समीक्षा हा साहित्यप्रकार इतर साहित्यप्रकारांप्रमाणं स्वतःमधेच परिपूर्ण आणि समाप्त होणारा नाही. तो स्वतः इतर साहित्यप्रकारांसारखा एक साहित्यप्रकार आहेच, पण त्याबरोबरच तो इतर साहित्यप्रकारांतील कलाकृतींचं मूल्यमापन करण्याचं कार्यही करीत असतो. स्वाभाविकच, हा साहित्यप्रकार हाताळणाऱ्यांची जबाबदारी दुहेरीही आहे आणि दुप्पटही आहे, असं मला वाटतं. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या समीक्षकांनी एकीकडून प्रस्थापित समीक्षेचे दोष टाळायला हवेत आणि दुसरीकडून स्वत:ला अनेक अंगांनी सज्ज-सिद्धही करायला हवं.
आपल्या समीक्षेची विश्वसनीयता वाढवू या
ज्या विषयाची समीक्षा करायची, त्या विषयाचा किमान काही व्यासंग असायला हवा. त्या विषयाच्या मांडणीचं काळजीपूर्वक आकलन करून घ्यायला हवं. मूल्यमापनाच्या कस
25/07/2026
गाभारा
--------------
गेली अठ्ठावीस युगं भ्रमात आहेस तू
भक्त येतात - जातात भाबडे
ठ्ठोब्बारखुमायचा गजर
तुझी पताका त्यांच्याच खांद्यावर
भक्तीत तुझ्या तल्लीन जनसागर
तरीही सवड नाही तुझ्याकडे त्यांची गाऱ्हाणी ऐकायला
दिसत कसे नाही समोरचे आदीम दुःख...
टाळ मृदंगाच्या गजराची सवय झालीय तुला
स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडालेला तू
कमरेवर हात ठेवून गर्दीत निर्विकार उभा...
आटली आहे चंद्रभागा
सावता माळ्याचा ओस पडलाय मळा
कांदामुळाभाजीला भावच नाही
आणि जगण्याला त्याच्या कुठेही वाव नाही
शेती पीकत नाही आणि ती विकता येत नाही म्हणून
नातवाने शेतात फास घेतलाय त्याच्या
तरीही गाभाऱ्यात तू मश्गुल रे कसा?
इंद्रायणीच्या डोहाकाठी उंच टाॅवर उभा
आणि तरीही रेंजमध्ये कुठे सापडत नाही तुकोबा
एकाएकी असा कसा झाला तो गायब?
पुष्पक हवाई कंपनीचा
उजळपणे सुरुच आहे वैकुंठगमनाचा धंदा
सत्य सांगितल्याची,
प्रश्न विचारल्याची किंमत म्हणून
दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या इथं कार्यकत्यांसह विचारवंतांना
तुकोबाच्या वारसांचे जगणे धोक्यात
आणि तरीही लागतेच कशी तुला झोप शांत?
भागवताची पताका खांद्यावर
नाचु कीर्तनाचे रंगी...
आणि प्रबोधनाच्या चिपळ्या वाजवत
देशभ्रमंतीवर गेलेला अचानक हरवलाय कुठेतरी नामा
दूर तिकडेच कुणीतरी किड्नॅप केला असावा त्याला
मिसिंगची फिर्याद नोंद नाही कुठेच
आणि त्याच्या शोधात चक्क वेड लागलंय जनाईला
ज्ञानेश्वराने घट्ट बंद केली आहे आतून पुन्हा झोपडीची ताटी
आणि आर्जवं करायला आता वेळ कुठे आहे मुक्ताईला
तुझ्या दारातून हद्दपार वाळवंटाबाहेर चोखा
आदेश आहेत, त्याला तिकडे वेशीबाहेरच रोखा
भक्तीच्या ग्लॅमरला भुललेला तू
आणि कान्होपात्रेने आता कुणाचा करावा धावा?
पुंडलिकाने थेट घराबाहेर काढलेय म्हातार्या आईबापाला
त्यांच्या आजारपणाची कटकट नको आहे त्याला
कुंभाराचा गोरा आता चिखल तुडवत नाही
गाडगी - मडकी तर अजिबात बनवत नाही
काय करावं पुढं नेमकं सूचत नाही त्याला
काळजीने देह त्याचा झिजुझिजु झाला
सोन्याचे दर टेकलेत आभाळाला
सोनाराचा नरहरी आता दागिने घडवत नाही
तुझं बोट धरल्यास तो सराफीत टिकत नाही
आणि जगण्याचा दुसरा कोणता त्याला मार्ग दिसत नाही
सेना न्हाव्याने बंद केलाय कधीच हजामतीचा धंदा
नाभिक संघटनेचा नेता बनलाय तो
बंकाला अजूनही मिळालेली नाही नोकरी
गुणपत्रकांसह आरक्षणाच्या रांगेतही तो तसाच ताटकळत उभा
शेख महमदाने तुझी विणा घरात अडकून ठेवली आहे खुंटीला
आता तिला कदाचित तो हात लावणार नाही पुन्हा
भावना दुखावल्याचा आरोप होण्याची भीती वाटतेय त्याला
दोहे रचायचे कधीचेच बंद केलेय कबीराने
अभिव्यक्तीची लढाई लढायचीच नाहीय त्याला
अज्ञातवासात गेलाय तो
झुंड थेट अंगावर येण्याची वाटते शक्यता
रिमिक्सची उडती चाल लावलीय पोरांनी एकनाथाच्या भारुडाला
भलताच निघतो अर्थ त्यातून
जगणे आपले व्यर्थ वाटून
गोदावरीच्या कोरड्या पात्रात तो सैरभैर एकलाच उभा
भ्रमिष्ट झाली आहे बहिणी फडकती ध्वजा
गहाळ झाली आहे तिची इमारत 'संतकृपा'
आणि पंढरीचाच ती विसरली आहे रस्ता...
विठोबा,
केवढी रे ही पडझड
आणि तरीही तू एवढा निवांत रे कसा?
लखलखीत तुझा गाभारा
गाभाऱ्याबाहेर येऊन आजूबाजूला डोकावून बघ की जरा
अंधार दाटून आला आहे कुट्टकाळा
हा कसला वारा सुटलाहे भणाणा
सहानुभावाचं थोडं पाणी लाव डोळ्यांना
उघड डोळे बघ नीट
अंधारातही वास्तव समोरचे लख्ख दिसेल तुला
खूप बदललाय काळ, बदललेय वर्तमान
काळाच्या पडद्याआड गेले साने मास्तर आणि गाडगेबाबा
हतबल झालाहे तुझा गोपाळांचा मेळा
ते होते म्हणून तर तू आहेस
त्यांनीच तर तुला केला मोठा आभाळाएवढा
पंढरी पुण्यभूमी पवित्र
तिलाही पडलाय हौशानवशांचा गराडा
आणि तू मात्र गाभाऱ्यात स्वतःतच हरवलेला...
बघ,
शक्य असेल तर गाभाऱ्याबाहेर पड
ती आरास, तो झगमगाट त्या जयघोषातून सवड काढ
आणि दुःखाच्या उदास वस्त्यांवर फेरफटका मार जरा
तेवढाच आधार वाटेल रे तुझ्या लेकरांना
तेवढाच एक उजेड मिणमिण टिकून आहे
दिशादर्शक पुढच्या पिढ्यांना...
तुला अडचण नसेल,
तर हातात हात घेऊया
वस्त्यावस्त्यांवर दोघं सोबतच फिरूया
चल ऊठ, काही काळासाठी तरी सोड तो गाभारा...
एकनाथ पाटील
इस्लामपूर
Click here to claim your Sponsored Listing.